प्रस्तावना: दहावीत असताना एका स्पर्धेत मला २ ओळी दिल्या आणि त्या कवितेत कुठेही वापरून अर्ध्या तासात एखादी कविता करायची होती. ओळी अश्या होत्या,
एकदा जंगल सभेत ठराव पास झाला
माणूस या शिवीचा विचार संमत झाला.
त्यावर मी केलेली कविता खालीलप्रमाणे,
कोल्हा आणि लांडगा यांच्यात घनघोर झाले युद्ध
'अरे माणसा' म्हणाला लांडगा, होऊन कोल्ह्यावर क्रुद्ध
कोल्हा गेला कोर्टात मिळवून घ्यायला न्याय
पण कळेच ना त्याला लांडगा नक्की म्हणाला तरी काय
लांडगा म्हणाला, जजसाहेब माझ्या बोलण्याची दखल घ्यावी
अगदी विचारपूर्वक मी ह्याला माणूस अशी दिली शिवी
अतिशय वाईट गोष्टीला आपण शिवी असे म्हणतो
पण माणूस तरी कुठे आपल्याशी जराही बरं वागतो
आपल्या रानात घर बांधायचा याला कसा अधिकार?
सर्वशक्तिमान असल्यासारखा चढलाय याला अहंकार
आपलं सोडा, माणसामाणसात किती होतात राजकारणं
दुसऱ्याच जिंकणं असह्य, पण दुर्लक्षितो स्वतःचं हरणं
जाणूनबुजून प्रदूषित करतो ध्वनी, जल, वायू
त्याच्यामुळे कमी होते सर्वांचे आयु
लांडग्याचे बोलणे ऐकत होते सगळेच भान हरपून
कोल्ह्याची तक्रार एव्हाना सगळेच गेले विसरून
नंतर एकदा जंगल सभेत ठराव पास झाला
माणूस या शिवीचा विचार संमत झाला