Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मुंगळ्याच्या भविष्याच्या जोरावर जिंकलेला 'अहिवंतगड'


प्राचीन कालखंडापासून महाराष्ट्रामधील ‘नाशिक’ शहराला खूप महत्व आहे ‘नाशिक’ आणि संपूर्ण परिसर हा प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र म्हणूनच प्रसिद्ध आहे. याच उक्तीप्रमाणे ‘नाशिक’ परिसरात विविध कालखंडात वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी आपल्या राज्याचे संरक्षण व्हावे यासाठी तेथील भौगोलिक परिस्थिती अनुसरून विविध किल्ले उभारले. याच ‘नाशिक’ जिल्ह्यातील ‘सातमाळा डोंगररांगेत’ विस्तीर्ण पठार आणि ऐतिहासिक महत्व असलेला ‘अहिवंतगड’ आजही उभा आहे.

नाशिक जिल्ह्यातील सातमाळा डोंगर रांगेतील ‘अहिवंतगड’ बघायचा असेल तर आपल्याला नाशिक वरून ‘सप्तशृंग गडावर’ जाणारी किंवा ‘नांदुरी’ या गावाची बस पकडणे कधीही सोयीचे ठरते या बसने आपल्याला नांदुरीच्या अलीकडील ‘दरेगाव’ या गावाच्या अगदी बाहेर उतरता येते. हे ‘दरेगाव’ म्हणजेच ‘अहिवंत’ गडाच्या पायथ्याचे गाव असून वणी – नांदुरी या मुख्य रहदारीच्या रस्त्यावरून अगदी १ किलोमीटर परिसरात ‘अहिवंतगडाच्या’ कुशीत वसलेले एक छोटेसे सुंदर टुमदार गाव आहे.

दरेगाव येथून दिसणारा 'अहिवंतगड'. 

ज्या दुर्गभटक्यांना ‘अचला किल्ला’ पाहून डोंगरयात्रा करत ‘अहिवंतगडावर’ यायचे असेल त्यांनी ‘बिलवाडी’ मार्गे जी नळीची वाट लागते तेथून यावे किंवा वणी - नांदुरी रस्त्यावर ‘अहिवंतवाडी’ येथून देखील येऊ शकतात. तसेच ‘अहिवंतवाडी’ येथील वाट ही अगदी खड्या चढणीची आहे जी चढून जाण्यात नवख्या दुर्गभटक्यांचा कस नक्कीच लागतो म्हणून ‘दरेगाव’ येथून ‘अहिवंतगडावर’ जाणारी वाट नक्कीच सोयीची ठरते.

दरेगाव गावामधील हनुमान मंदिर अत्यंत सुंदर असून येथील हनुमानाची मूर्ती अत्यंत देखणी आहे. ‘अचला किल्ला’ करून आल्यावर जर ‘अहिवंत गड तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचा असेल तर हे हनुमान मंदिर मुक्कामासाठी अत्यंत योग्य ठिकाण आहे. याच हनुमान मंदिराशेजारून वाट ‘अहिवंतगडावर’ जाते. ‘दरेगाव’ मधून साधारणपणे १.३० ते २ तास आपल्याला ‘अहिवंतगड’ गाठण्यास लागतात. ‘अहिवंतगडाच्या’ अगदी शेजारी खेटून असलेला एक डोंगर आपले लक्ष वेधून घेत असतो त्या डोंगराला ‘बुध्या’ असे ओळखले जाते. ‘दरेगाव’ मधून आपण ज्यावेळेस अहिवंत गडाकडे जाण्यास निघतो तेव्हा हा ‘बुध्या’ आणि प्रचंड मोठा विस्तार असलेला ‘अहिवंतगड’ आपले लक्ष वेधून घेत असतो.


‘दरेगाव’ येथून ‘अहिवंतगडावर’ जाणारी वाट आणि उजवीकडे कोपऱ्यात दिसणारा 'मोहनदरी उर्फ शिडका किल्ला'.

‘दरेगाव’ येथून मळलेली पाऊलवाट असल्याने ही पाऊलवाट आपल्याला सरळ घेऊन जाते ते ‘बुध्या’ आणि ‘अहिवंतगड’ यांच्यामध्ये असलेल्या घळीमध्ये. येथे एक छोटा आणि सोपा कातळटप्पा चढून गेल्यावर आपण ‘बुध्या’ आणि ‘अहिवंतगड’ यांच्या खिंडीच्या मध्यभागात पोहोचतो या खिंडीच्या मध्यभागी उभे राहिले तर आपल्या डाव्या बाजूला गडाचे काही महत्वपूर्ण अवशेष बाळगलेला ‘बुध्या’ तर उजव्या बाजूस ऐतिहासिक ‘अहिवंतगड’ असे दृश्य आपल्याला पहायला मिळते. ‘अहिवंतवाडी’ येथून येणारी खडी चढण असलेली पाऊलवाट याच ठिकाणी खिंडीत एकत्र येऊन मिळते. याच खिंडीमधून डावीकडे जाणारी पाऊलवाट ही ‘बुध्या’ येथे जाते तर उजवीकडची पाऊलवाट ही ‘अहिवंतगड’ येथे जाते.

पहिले डावीकडे जाऊन ‘बुध्यावर’ असलेले अवशेष पहाणे जास्त सोयीस्कर ठरते. यासाठी बुध्यावर जाणारी पाऊलवाट पकडून थोडे वर गेले असता कातळात खोदलेल्या जवळपास नव्वद अंशातल्या ५ ते ६ पायऱ्या मात्र आश्चर्यचकित करतात. या पायऱ्यांनी वर चढून गेले असता एक छोटी पाऊलवाट पकडून वर चढून गेले असता आपण सरळ उभे राहतो ते एका मोठ्या बुरुजासमोर. ‘बुध्यावर’ असलेला हा बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. या बुरुजावर उभे राहिले असता समोर अहिवंतगडाचा पसारा आपल्याला पहायला मिळतो तसेच या बुरुजावरून परत पाऊलवाटेवर येऊन थोडेसे उजवीकडे गेले असता आपल्याला ‘बुध्यावर’ असलेले एकमेव पाण्याचे टाके पहायला मिळते. या पाण्याच्या टाक्याच्या पलीकडे समोर सप्तशृंग गडाचा सुळका मात्र लक्ष वेधून घेतो तसेच बाजूला थोडेसे दुरवर असलेले ओझरखेड धरण देखील आपले लक्ष वेधून घेते. वातावरण जर स्वच्छ असेल तर ‘रामसेज किल्ला’ आणि ‘चामरलेणी’ पर्यंतचा प्रदेश येथून आपल्याला दिसतो.


अहिवंतगडाच्या वाटेवरून दिसणारा 'मोहनदरी उर्फ शिडका किल्ला'.

दुर्ग अवशेष बिलगून असलेल्या ‘बुध्यावरून’ उतरून आपण परत खिंडीत यायचे आणि उजवीकडून ऐतिहासिक ‘अहिवंतगडाच्या पाऊलवाटेवरून काही पावट्या (खोबणी मधल्या पायऱ्या) चढून ‘अहिवंतगडाचा’ माथा गाठायचा. ‘अहिवंतगड’ याचा विस्तार फार मोठा असल्याने त्याच्या चारही बाजू दुरवर पसरलेल्या आपल्या पहायला मिळतात. तसेच गडाचे पठार अत्यंत मोठे असून संपूर्ण पठारावर आपल्याला बरेच अवशेष विखुरलेले पहायला मिळतात. गडाच्या पूर्व बाजूची वाट आपण पकडून चालत राहिलो की साधारणपणे २० मिनिटात आपण राजवाड्याच्या चौथऱ्याजवळ येऊन पोहोचतो आजही या वाड्याचे अवशेष आजूबाजूला विखुरलेले आपल्याला दिसतात. हा वाडा पाहून आपण थोडे पुढे गेले असता एक छोटा झरा आपल्याला पहायला मिळतो या झऱ्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.

या झऱ्याच्या शेजारून पुढे गेलो असता आपल्याला गडदेवता ‘हनुमान’ आणि ‘सप्तशृंग देवी’ यांची मूर्ती उंचवट्यावर पहायला मिळते. ही ‘सप्तशृंग देवी’ थोडीशी भग्न पावलेली आहे परंतु आजही दरेगाव, अहिवंतवाडी तसेच बेलवडी येथील कोणताही ग्रामस्थ गडावर आले असता या देवतांची पुजा करतात. या दोन्ही मूर्ती आपल्याला उघड्यावर पहायला मिळतात. मध्ययुगामधल्या या शक्तीदेवता आजही उन, पाऊस, वारा खात आजही गडावर उभे आहेत. या मूर्तींचे रक्षण होणे नक्कीच गरजेचे आहे. येथे जवळच एक तळे आपल्याला पहायला मिळते आज ह्या तळयामधले पाणी शेवाळलेले आहे जर हे तळे स्वच्छ केले तर नक्कीच गावातल्या लोकांना याचा वापर करता येईल. येथून पुढे गेले असता आपल्याला अहिवंत गडाच्या मधोमध एक टेकडी लागते याच्यावर देखील काही अवशेष विखुरलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच टेकडीच्या डावीकडच्या डोंगर कड्याच्या बाजूने आपण पुढे जायचे आणि दरीच्या काठाने थोडेसे खाली उतरले असता आपण सरळ पोहोचतो ते ‘अहिवंतगडाच्या’ दक्षिणेकडील कड्यामध्ये असलेल्या गुहेत.


दरेगाव येथील वाटेवरून दिसणारा अहिवंतगडाचा 'बुध्या'. 

ही कातळकोरीव गुहा प्रशस्त असून साधारणपणे २० ते २५ लोकं यामध्ये नक्की राहू शकतील तसेच या गुहेमध्ये एक पाण्याचे टाके देखील पहायला मिळते परंतु ते कोरडे आहे. ही गुहा किल्ल्याच्या कड्यावर असल्याने सुरक्षितता बाळगणे महत्वाचे आहे. ही गुहा पाहून झाल्यावर सुरक्षितपणे कडा चढून परत पठारावर यायचे आजूबाजूचे छोटे मोठे पसरलेले अवशेष आणि समोर दिसणारा ‘अचला किल्ला’ नक्कीच आपले लक्ष वेधून घेत असतात. संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही या ‘अहिवंतगडाच्या’ या पठारावर असाल तर ‘पश्चिम रंगाने’ न्हाऊन निघालेला ‘अचला किल्ला’ फारच देखणा दिसतो तर दुरवर इंग्रजांच्या काळात उभारलेले ‘चणकापूर’ धरण सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालेले असते.

येथून पुढे चालत आले असता आपल्याला एक दगडी कुंड ‘अहिवंतगडावर’ पहायला मिळते. ह्या कुंडातील पाणी देखील पिण्यासाठी अत्यंत योग्य आहे. तसेच हे कुंड वर्षाचे १२ महिने थंडगार पाण्याने भरलेले असते. याच कुंडावर एका दगडी चौथऱ्यावर एक शिल्प आपल्याला पहायला मिळते त्यामध्ये घोड्यावर बसलेला एक वीर आणि त्याच्या पाठीमागे एक स्त्री हात जोडून बसलेली आहे असे हे शिल्प आहे. स्थानिक लोकं या शिल्पाला ‘खंडोबा’ असे म्हणतात आणि त्यांची पुजा देखील केली जाते. याच कुंडाच्या जवळून एक वाट खाली ‘बेलवडी’ गावात जाते. या गडाच्या टेकडीवरून फिरून जात असताना आपल्याला एक मोठा तलाव पहायला मिळतो आणि याच तलावाच्या अलीकडे दगडी चौथरा देखील आपल्याला पहायला मिळतो.


अहिवंतगडाच्या बुध्यावर असलेले अवशेष यामध्ये आपल्याला पाण्याच्या टाक्या, वर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि बुरुज हे अवशेष पाहायला मिळतात.  

येथून जवळच असलेली अहिवंतगडाची माची पाहण्यासारखी आहे. या माचीवर दोन मोठे तलाव खोदलेले आपल्याला पहायला मिळतात यातील पाणी अत्यंत गढूळ आहे. यामध्ये बऱ्याचदा आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी सोडलेल्या गाई, म्हशी आणि शेळ्यांचा वावर येथे असतो. येथून जवळच ईशान्य दिशेकडे आपल्याला जाताना भग्न दरवाजा पहायला मिळतो तसेच तेथून काही पायऱ्या उतरलेल्या आपल्याला दिसतात. या पायऱ्यांवरून खाली उतरत गेले असता दुसरा भग्न दरवाजा देखील पहायला मिळतो. याच बाजूने थोडे पुढे गेले असता आपल्याला २ पाण्याची टाकी पहायला मिळतात ही टाकी पाहून आपण डाव्या बाजूने जात असताना आपल्याला काही कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात या उतरून गेल्यावर आपण कड्याच्या बाजूने कातळात खोदलेल्या गुहांच्याजवळ आपण जाऊन पोहोचतो. 

या कातळात खोदलेल्या दोन खोल्या मुक्कामायोग्य आजिबात नाहीत यामध्ये गडावर राहणाऱ्या जनावरांनी अत्यंत घाण केलेली आहे. या गुहा पाहून आपली गडफेरी संपते परंतु हीच पाऊलवाट पकडून चालत जात असता आपण एका ‘बारी’ मध्ये पोहोचतो. ‘बारी’ म्हणजे दोन डोंगरांच्या मध्ये असणारी खिंड. या ‘बारी’ मधून डावीकडे वळाले असता आता मोठा रस्ता झालेला असून हा रस्ता आपल्याला सरळ मागच्या बाजूने ‘दरेगाव’ या अहिवंत किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात घेऊन जातो. असा हा विस्तीर्ण पठार असलेला ‘अहिवंतगड’ नक्कीच त्याच्या अवशेषांनी मनाला भुरळ पडतो. 


'अहिवंत गडाच्या' बुध्यावरून दिसणारा 'सप्तशृंगी गड' 

अहिवंतगडाचा इतिहास:-   

‘अहिवंतगड’ नक्की कोणी बांधला हे निश्चितपणे पुराव्यानिशी सांगता येत नाही. इ.स. १५५३ साली ‘बुरहान निजामशहा’ याच्या ताब्यात नाशिक जिल्ह्यातील २६ किल्ले होते त्यामध्ये ‘अहिवंतगडाचा’ देखील समावेश होता. याचा उल्लेख हा ‘सय्यद अली तबातबा’ याने लिहिलेल्या ‘बुरहान – ई – मासिर’ या ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो. यामध्ये तो ‘अहिवंतगडाचा’ उल्लेख ‘अलहवंन्त’ असा करतो. ‘अहिवंतगड’ अहमदनगरच्या निजामशाह याच्याकडे असताना त्यावेळेस ‘शहाजी महाराज’ हे निजामशाहीचे रक्षण करत होते.

याच कालावधी मध्ये दिल्लीचा बादशाह ‘शहाजहान’ याने ‘शहाजी महाराजांच्या’ पाडावासाठी इ.स. १६३६ मध्ये आपले सरदार खान दौरान, खान अमन आणि शाहिस्तेखान यांना ‘शहाजहान’ याने पाठविले. नाशिक आणि परिसरातील किल्ले मुघलांच्या ताब्यात आणण्याची कामगिरी ‘शहाजहान’ याने ‘शाहिस्तेखान’ याच्यावर सोपवली होती. शाहिस्तेखान याच्या हाताखालील ‘अलीवर्दी खान’ याने इ.स. १६३६ साली ‘अहिवंतगडाचा’ पाडाव केला. इ.स. १६६९ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या विरुद्ध मोहीम उघडली.  


बुध्यावरून दिसणाऱ्या अहिवंत गडाच्या पायऱ्या आणि 'अहिवंतगड'.
  
या महत्वाच्या मोहिमेमध्ये मराठ्यांचे सेनापती ‘प्रतापराव गुजर’ यांनी नोव्हेंबर १६७० मध्ये ‘अहिवंतगड’ हा मोगलांकडून जिंकून घेतला या लढाईत स्वतः शिवाजी महाराज होते असे उल्लेख आपल्याला मिळतात. ‘अहिवंतगड’ मुघलांच्या जवळील फार महत्वाचा किल्ला होता. गंगथडी आणि आणि खानदेश या दोन्हीकडे जाणारे रस्ते हे अहिवंतगडाजवळून जातात म्हणून या गडाचे महत्व ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या काळात खूप जास्त होते. जेव्हा ‘अहिवंतगड’ शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला तेव्हा चांदोर (चांदवड) येथील मुघल सरदार ‘दाऊदखान’ हा खुपच अस्वस्थ झाला औरंगजेबाची आपल्यावर गैरमर्जी होणार हे त्याने ओळखले. कारण या काळात ‘अहिवंतगड’ हा ‘खानदेश आणि गंगथडी’ या दोन्ही भागाचा टेहळणी नाका होता. हवी ती किंमत देऊन ‘अहिवंतगड’ जिंकायचा असे ‘दाऊदखानाने’ ठरविले. ‘अहिवंतगड’ मराठ्यांनी त्याच्याकडून जिंकून घेतला हे त्याचे शल्य ‘दाऊदखान’ याच्या मनात सलत होते.

याचे मुख्य कारण म्हणजे मराठ्यांनी ‘दाऊदखानाला’ हातोहात बनविले होते ‘मराठे हे बुऱ्हाणपूर येथील पेठ लुटणार आहेत’, अशी बातमी शिवाजी महाराजांच्या सहकाऱ्यांनी सगळीकडे पसरवलेली होती. या बातमीचा परिणाम असा झाला की ‘दाऊदखान’ हा भली मोठी मुघलांची फौज घेऊन बुऱ्हाणपूरकडे निघाला परंतु तो अजिंठ्याच्या लेण्यांच्या जवळ पोहोचला असता त्याला त्याच्या गुप्तहेरांकडून बातमी मिळाली की ‘मराठे’ हे ‘अहिवंतगडाच्या’ रोखाने गेलेले आहेत. हे समजल्यावर ‘दाऊदखान’ याने मोठ्या गतीने ‘अहिवंतगडाच्या’ दिशेने वाटचाल सुरु केली. परंतु अर्ध्या रस्त्यात ‘दाऊदखान’ पोहोचल्यानंतर त्याला समजले की मराठ्यांनी ‘अहिवंतगड’ जिंकून घेतला आहे. प्रत्यक्षात लढा न होता ‘अहिवंतगड’ हा मराठ्यांकडे गेला आणि एवढेच नाही तर मुघलांचा सरदार ‘दाऊदखान’ हा प्रसंगी बेसावध होता ही गोष्ट ‘औरंगजेब’ याला पटण्यासारखी आजिबात नव्हत

Share the post

मुंगळ्याच्या भविष्याच्या जोरावर जिंकलेला 'अहिवंतगड'

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×