माणिकगड- काहीसा अबोल आणि इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे दुर्लक्षित केलेला एक अप्रतिम किल्ला. अप्रतिम हा शब्द केवळ भटकंतीकरांसाठी आहे. पण ज्यांना ट्रेक करण्याची सवय नसेल त्यांना मात्र माणिकगड म्हणजे जरास अवघड काम आहे. किल्ल्याबद्दल थोडसं सांगतो की हा किल्ला तसा जुना आहे म्हणजे अगदी शिवकालापुर्वी सुद्धा या किल्ल्याचा वापर होत असावा. शिवकाळात पालकर घराण्याकडे या किल्ल्याचे किल्लेदारपद होते असे काहींच्या लिखाणात आढळून येते. किल्ल्याची उंची मोजाला गेलं तर साधारण ५५० मीटर भरेल. पण आजूबाजूच्या जंगलामुळे आणि कातळकड्यामुळे हा किल्ला अवघड दिसतो.
खूप दिवसांपासून वडगावचा आणि अनेक ट्रेकर मंडळींचा लाडका असणारा राहुल जांभूळकर हा अवलिया माणूस सारखा मागे लागलेला, शेवटी एकदा ठरवले की जाऊन बघून येऊ… अनायसे पेणला होतो आणि माणिकगड तिथून केवळ २० मैल . बेत आखला आणि या माणिकला भेट देण्यासाठी निघालो. उलट सुलट प्रवास करून जेव्हा चौक फाट्यावर उतरलो तेव्हा सकाळचे ८.३० वाजलेले.
खरं तर कोकणातून जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे मुंबई-गोआ महामार्गावरून खारपाडा गावातून रसायनी मार्गे वाशिवली गावात जाणे आणि मग तिथून वडगाव. आणि पुण्याहून येणार्यांसाठी मात्र खोपोली-चौक-वाशिवली-वडगाव हा मार्गच जास्त सोयीस्कर. तसेच पेण-खोपोली मार्गावरून सुद्धा वाशिवलीला जाण्यासाठी एक मार्ग आहे. पण चौक आणि रसायनी मार्गे शक्यतो नवीन माणसाने जाणे योग्य.
चौक फाट्यावर उतरल्यावर पुढे वडगाव ला जाण्यासाठी आधी वाशिवालीला जाव लागतं आणि मग पुढे रिक्षा किवा बस ने वडगाव. पण बस च्या वेळा नियमित नसल्याने स्वताचा वाहन नेणं जास्त चांगलं. किंवा वाशिवली पर्यंत रिक्षाने जाऊन पुढे वडगाव साठी वाट बघायची हा एक उपाय. तिथून वडगावला पोचलो तेव्हा कळल की सोबत सह्याद्री प्रतिष्ठानची काही मंडळी आणि राहुल चा जिवलग मित्र साहिल सोबत येणारेत. सगळ्यांना सोबत घेऊन निघण्यास १० वाजले आणि सूर्यदेवाने नेहमीचा भाजून काढायचे काम सुरु केले आणि त्यात मे महिन्याचे दिवस आणि भरीस भर म्हणून कोकणातला दमटपणा. गड अजून बराच दूर होता.
अजून फक्त अर्धा तास आहे असा एक तासात अनेक वेळा ऐकल्यावर हे मिळालं. गड अजूनही दूर होता पण राहुल आणि साहिलसोबत कत्थक आणि शास्त्रीय संगीत यावर भरपूर गप्पा मारत सुरुवातीचा उजाड टप्पा पार केला. तसेच सह्याद्री प्रतिष्ठानच्या नुकताच ओळख झालेल्या मित्रांसोबत त्यांच्या मोहिमांबद्दल चर्चा करत पुढचे टेकाड चढले. आणि एका विस्तीर्ण पठाराने आमचे स्वागत केले. याच पठारावरून दोन रस्ते फुटतात. एक जराशा अवघड अशा वाटेने जातो तर दुसरा घनदाट अशा जंगलातून जातो. आम्ही पहिल्या वाटेने जाणार होतो कारण या वाटेने वेळ कमी लागतो. राहुलच्या मते या वाटेला एका पायाची वाट म्हणतात. पठारावरून सांकशी, कर्नाळा, प्रबळ, कलावंतीण आणि इरशाळ यांसारख्या दुर्गामित्रांच अगदी सुरेख दर्शन घडतं.
कर्नाळा |
सांकशीचा किल्ला (उजवीकडील डोंगर) |
या अजस्त्र कातळकड्याच्या डाव्या बाजूने ती एका पायाची वाट जाते आणि मग पुढे एका घळीच्या वाटेने आपण वर चढतो.. सांगायचा मुद्दा असा की ही घळ तेव्हा आम्हाला अवघड वाटली कारण सर्वांकडचं पाणी त्यावेळेस संपलेल आणि अजून पाऊण तास चढायला लागणार होता आणि त्यातच उन्हामुळे इथला कातळ अक्षरशः गरम तवा झालेला. पण मिळेल तस आधार देत घेत, खिशातल्या खडीसाखरेने घसा ओला करत सुमारे ३ तासांनी(पायथ्यापासून) आम्ही वर पोचलो. गडावर पाहण्यासारखा अस अजिबात काही खास नाहीये पण गड चढून गेल्यावर जे समाधान मिळत ते अवर्णनीय आहे..
चुन्याचा घाणा |
मोडकळीस आलेले प्रवेशद्वार |
गडावरून विस्तृत भूप्रदेश दिसतो. त्यामुळेच टेहेळणी साठी हा गड बांधण्यात आला असावा असा अंदाज करता येतो. गडावर काही अवशेष नक्की आहेत. वर गेल्या गेल्या पहिले टाकीकडे धाव घेतली आणि पोट फुटेपर्यंत पाणी प्यायला. दुपारचे २ इथेच झाले त्यामुळे जेवण झाल्यावर उतरायला सुरुवात केली आणि उतरताना मात्र मग तुलनेने सोप्या असणाऱ्या वाटेने उतरण्यास सुरुवात केली. राहुल महाराजांच्या कृपेने गडाचे दोन्ही रस्ते बघायला मिळाले.
सर्वात डावीकडे कलावंतीण, प्रबळगड, मध्ये इर्शाळगड आणि उजवीकडे माथेरान |
हि खरी गडाची मुख्य वाट आणि तिथूनच चढताना हे दृश्य दिसते. खरं तर माणिकगडाचे हेच मुख्य आकर्षण आहे की त्याला असलेले २ सुळके.. यातला उजवीकडचा सुळका म्हणजे माणिकचा लिंगी. डावीकडच्या सुळक्याला काय म्हणतात ते कळू शकले नाही. पण जर या सोप्या वाटेने गेलं तरच या सुळक्यांचे दर्शन होते. त्यामुळे जे कोणी पुढे जातील त्यांनी चढताना अवघड वाटेने जाऊन उतरताना या वाटेने येण जास्त चांगलं.. माणिकगड हा खरा पावसाळ्यातला किल्ला. साधारण ऑगस्ट महिन्यात गेलं की सह्याद्रीचा खरं रूप दिसतं.
वडगावला पोचलो तेव्हा २२ मैल चालून झालेलं. आणि नेहमीप्रमाणे घराची ओढ लागलेली. राहुल चे आभार मानून वडगाव सोडला ते परत येण्याचे आश्वासन देऊनच. जाताना प्रवासात मात्र माणिकगड सारखा खुणावत राहिला..( येताना साधारण ५ वाजता वडगाव वरून खोपोलीला जाण्यासाठी बस आहे अन्यथा वडगाव वरून पुन्हा वाशिवली करत यावा लागत आणि ही बस चुकली तर पुढे कोणत वाहन मिलेळ याची खात्री नाही)
साभार- राहुल जांभूळकर आणि साहिल....
जायचे कसे-
माणिकगड ला जायचं म्हणजे फारसे कष्ट करावे लागत नाहीत. गडाला पोहोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पुण्याहून येणाऱ्यांसाठी पुणे-लोणावळा-खोपोली-चौक फाटा-वाशिवली-वडगाव हा सर्वात सोपा मार्ग आहे. याशिवाय खोपोली-पेण रस्त्यावरच्या इसांबे फाट्यावरून सुद्धा वानीवली मार्गे वडगावला पोहोचता येते. पण पुणेकरांनी आधीच्याच मार्गाचा वापर करावा. जे कोकणातून येणार आहेत त्यांच्यासाठी मुंबई-गोवा मार्गावरील खारपाडा गावातून(पेण सोडल्यावर पनवेलच्या दिशेने सुमारे १५ किमी अंतरावर खारपाडा गाव आहे) तिथून उजवीकडे वळून रसायनी मार्गे सुद्धा वाशिवालीला जाता येते.
मुंबई करांसाठी वरील दोन पैकी कोणताही मार्ग सोयीस्कर आहे..
हे झाला स्वताचा वाहन असणाऱ्यांसाठी.. पण माझ्यासारख्या एस्टी वर विश्वास ठेवणार्यांना मात्र बरीच कसरत आहे. खोपोली वरून सकाळी ७ वाजता वडगाव गावाला जाण्यासाठी गाडी सुटते आणि त्या गाडीने गेलं तरच संपूर्ण किल्ला एका दिवसात पाहता येईल. किंवा दुसरा मार्ग म्हणजे खोपोली वरून बसने चौकला उतरणे आणि तिथून सतत असणाऱ्या वडापाने वाशिवली पर्यंत जाणे पण वाशिवली ते वडगाव जाण्यासाठी मात्र रिक्षा संपूर्ण भरणे भाग आहे. अन्यथा कुणाला तरी लिफ्ट मागणे याशिवाय पर्याय नाही. पनवेल वरून सुद्धा वाशिवली साठी दर तासाने गाड्या आहेत. पेण वरून जाण्यासाठी सकाळी ६ वाजता कर्जत गाडी आहे जी खारपाडा मार्गे जाते. त्यागाडीने वाशिवालीला जाता येते..
हे झाला कसा जायच पण जाण्यापेक्षा येणं जास्त महत्वाचे असल्याने ते सांगणं जास्त महत्वाचे आहे. आपल्याला साधारण गड उतरे पर्यंत ५ होतात. आणि बरोबर याच वेळेला म्हणजे साधारण ५.१५ वाजता वानीवली वरून खोपोलीला येण्यासाठी बस आहे. तसेच वानीवली वरून इसांबे फाट्यावर जाण्यासाठी ६ सीटर सुद्धा उपलब्ध आहेत. फक्त आपण ५-५.१५ पर्यंत वानिवली मध्ये येऊ याची काळजी घेणे. वानीवली ते वडगाव अंतर २.५ किमी आहे.
(आधीचा ब्लॉग चुकून डिलीट झाल्यामुळे पुन्हा लिहिला आहे)