ठाणे : एका अज्ञान व्यक्तीकडून Safexpay out कंपनीचे सॉफ्टवेअर (Software) हॅक झाल्याची तक्रार कंपनीच्या लीगल अॅडवाइजर मनाली साठे यांनी केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, कंपनीचे सॉफ्टवेअर हॅक झाल्याने कंपनीला 25 कोटी रुपयांचा फटका बसला असल्याचं सांगण्यात आलं. तर सायबर गुन्ह्यांअंतर्गत ही तक्रार नोंदवून घेण्यात आली. सध्या या गुन्ह्याचा तपास हा ठाण्याच्या सायबर सेल (Cyber Cell) मार्फत करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आलीये.
Related Articles
पण या तपासामध्ये अनेक बाबींची उलगडा पोलिसांना झाला. सुरुवातीच्या तपासामध्ये काही गोष्टी पोलिसांना आढळून आल्या. 25 कोटी पैकी 1,39,19,264 एवढी रक्कम ही रियाल इंटरप्राइजेसच्या नावे एचडीएफसी बँक खात्यात जमा झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान रियाल इंटरप्राइजेसचे कार्यालय हे वाशी, बेलापूर आणि नवी मुंबईत इतर ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांनी दिली. त्यावरुन पोलिसांना रियाल एंटरप्राईजेसच्या वाशी आणि बेलापूर कार्यालयांमध्ये जाऊन तपास केला.
या तपासारदम्यान पोलिसांना विविध बँक खात्यांची माहिती आणि करारनामे सापडले. तर या करारनाम्यांमध्ये आणखी काही गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्या. या करारनाम्यानुसार, नौपाडा पोलिसांच्या हद्दीत असलेल्या बालगणेश टॉवर स्टेशन रोड इथल्या पत्त्यावर काही लोकांच्या नावावर बनावट कादपत्रकरुन पाच भागीदारी संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या. या कंपनीची चौकशी करताना पोलिसांना 260 बँक खात्यांची माहिती मिळाली.
रियाल कंपनीच्या सापडलेल्या या बँक खात्यांमधून मोठ्या रक्कमेची उलाढाल करण्यात आल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली होती. तर यातील काही रक्कम ही परदेशात पाठवण्यात आल्याचं यावेळी समोर आलं. त्यामुळे बनावट कागपत्रांच्या आधारे बँक खाती उघडण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. या प्रकरणात पोलिसांनी संजय सिंग, अमोल आंधळे उर्फ अमन, केदार उर्फ समीर दिघे, जितेंद्र पांडे, नविन या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणात पुढील तपास देखील सुरु आहे.
काही ठिकाणी 161,80,41,92,479 इतक्या रक्कमेची फसवणूक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पण ही रक्कम सायबर फ्रॉडची नसून विविध खात्यांमधील उलाढालींची असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे Safexpay out कंपनीने नोंदवलेल्या फसवणूकीच्या रकमेचा तपास सध्या पोलीस करत आहे. या तपासात पोलिसांच्या हाती आणखी कोणत्या गोष्टी लागणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.