"Kiss Day"
काल हजारो वर्षातुन एकदा न भूतो न भविष्यती खूप मोठा संयोग घडून आला,महाशिवरात्री आणि Valentine साप्ताहातील "Kiss Day" एकाच दिवशी आलेत.तशी या दोन दिवसांची तुलना करणे योग्य नाही,पण काल जो "किस" पडला त्याचा महिमा काही औरच....म्हणजे बघाना
कठोर शिवभक्ताने उपवास करून आपल्या पोटाचा "किस" पाडला....
काही हंगामी उपासदारांनी समस्त फराळी खाद्य वस्तूंचा यथेच्छ "किस" पाडला...
महिला वर्गाने आलू,रताळे, कंदमुळे यांचा "किस" पाडला....
बच्चे कंपनीने त्या किसाचा पुनश्च "किस" पाडून आपल्या आईची डोकेदुखी वाढविली..
तिकडे नास्तिक मंडळींनी महाशिवरात्रीचा कसला आलाय उपवास म्हणून आपल्या बुद्धीचा "किस" पाडला....
इकडे तरुण तरुणींनी एकमेकांना भेटून Valentine सप्ताहानिमित्त "किस" पाडला...
ज्यांना भेटून पण जमले नाही त्यांनी मनातल्या मनात "किस" पाडला...
ज्यांना भेटणे शक्य नाही त्यांनी व्हाट्स अप आणि फेबू. वर "किस" पाडला....
ज्या युवक युवतींना आई बापाने कुठे भटकू दिले नाही त्यांनी घरीच आलुचा आणि रताळ्याचा "किस" पाडून तोंड गोड करून घेतले....
कुणी झाडाखाली तर कुणी झाडावर "किस" पाडला...
कुणाकुणाचा तर इतरांना झुरून-झुरून जीवाचा "किस" झाला....
कुणी स्वतःलाच झुरून-झुरून स्वतःचाच "किस" पाडला...
ज्यांचा दिवस साजरा झाला त्यांनी उद्या काय करायचे यासाठी आपल्या बुद्धीचा "किस" पाडला...
ज्यांचा वाया गेला त्यांच्या हृदयाचा "किस" पडला....
तिकडे गावाकडंच तर विचारूच नका नुसता हा किंवा ही दुरून जरी दिसला/दिसली तरी साऱ्या गावात "किस" पडतो....
शाळा कॉलेजात कारण नसताना लावलावी करणारे गावभर "किस" पाडतात तो वेगळा....
विवाहित तसेच नौकरदार जोडप्यांचे तर विचारूच नका, भरीस भर आज मुलांच्या शाळेला सुट्टी!!!! मुलं घरीच म्हणून त्यांनी आलू,रताळे आणि कंदमुळे यांचाच "किस" पाडणे योग्य समजले....
कॉर्पोरेट जोडप्यांनी तर सुट्टी नाही म्हणून आपल्या नशिबाचा "किस" पाडला...
नुकतंच लग्न जुळलेल्या म्हणजे साक्षगंध आणि लग्न याच्या मधला जो काळ असतो त्यांची तर खूपच
गोची.काय करावे ? काय बोलावे हेच सुचेना म्हणून त्यांनी तेच आपलं आलू,रताळे यांचाच "किस" पाडला.वरून उपवास केलास काय गं ??? बघ हं जपून...फराळाचं करशील हं...आणि आराम कर.असं म्हणून वेळ मारून नेली...साक्षगंध आणि लग्नाच्या मधला जो काळ असतो,तोच खरा मधुचंद्र.बाकी लग्नानंतर मधुचंद्र असतो ही फक्त आणि निव्वळ अंधश्रद्धा आहे....लग्नानंतर तेच असतं.... आलू,रताळे आणि कंदमुळे यांचा फक्त आणि फक्त "किस"…………
तसंही या क्षणभंगुर जीवनात आपण करतोच काय ? निव्वळ "किस" पाडतो प्रत्येक गोष्टींचा....
वरील सर्व प्रकारातून जे सुटलेत त्यांनी एकच मंत्र म्हणावा....
*हर बोला...हर हर महादेव.....*
#गणेश कुबडे