१९७४ साल असावं.घोरपडीतील लष्कर भागात "आक्रमन"चं शूटींग चालू होतं आणि ते पाहण्यासाठी आसपासच्या भागातील हजारो लोकांनी गर्दी केली होती.त्या गर्दीत मीही होतो. पाचवीत असलेल्या मला ’शूटींग’ प्रकाराचं जाम अप्रूप वाटायचं.जत्रेत असावं तसं वातावरण असायचं.लोकांची गर्दी,दिग्दर्शकाची लगबग,त्याचं आपल्या हाताखालच्यांना सूचना देणं,आणि बाजूला कलाकारांचं तालीम करणं.हे सारंच त्या वयाला भुरळ घालणारं होतं.त्यामुळे सायकलवर तंगडतोड करित ते जिथं असेल तिथं ते पाहण्यासाठी जात असे.("काला पत्थर"आणि "सत्यमं शिवमं सुंदरमं"चं शूटींग पाहण्यासाठी राजकपूरच्या राजबागेत असाच जीवाचा आटापीटा करत गेलो होतो.)
"आक्रमन"च्या चित्रिकरणादरम्यान लष्कर भागातलं सारं वातावरण राजेशमय झालं होतं.तो काळ त्याचा होता.त्यामुळे संजीवकुमार आणि रेखा यांच्यासारखे अभिनेते तेथे असूनही त्यांची फारशी दखल कोणी घेत नव्हते. राजेश खन्नाच्या जाण्यानं आज हे सारं डोळ्य़ापुढे उभं राहीलं.लष्करी गणवेषातील राजेश खन्ना,त्याचं कुबड्यांवर चालनं आणि युध्दावर निघालेल्या जवानांमध्ये वीरश्री जागविण्यासाठी ’देखो वीर जवानो’ हे गीत गाणं,हे सारचं डोळ्य़ापुढे फेर धरून उभं आहे.राजेशच्या सुपरस्टार पदाची,त्याच्या अभूतपूर्व लोकप्रियतेची जादू मला तेथे अनुभवायला मिळाली.अर्थात त्या वातावरणाला आणि लोकांच्या तोंडी सतत असलेल्या त्याच्या नावाला भूलून मी त्याच्या प्रेमात पडलो नाही.थोड्या कळत्या वयात "आनंद"आणि "आराधना" पाहीला आणि मला तो आवडू लागला.त्याच्या अभिनय सामर्थ्याची जाणीव झाली.
’आराधना’ झळकला तेंव्हा मी जेमतेम पाच वर्षाचा होतो,तर ’सौतन’ गाजत असताना वीसेक वर्षाचा असेन.हे सांगण्याचे कारण एवढेच की,त्याच्या लोकप्रियतेला भारावून मी त्याच्या प्रेमात पडलो नव्हतो, तर त्याचा भावूक,सालस,लोभस आणि चित्रपट संपल्यानंतरही मन व्यापून राहणारा अभिनय ही मला त्याच्या प्रेमात गुरफटविणारी गोष्ट होती. मी त्याचा चाहता होण्याचे कारण होते.ज्या काळात आलम भारतामध्येच नाही, तर स्पेन सारख्या हिंदीचा गंधही नसलेल्या देशात त्याचे गारूड चित्रपट रसिकांवर मोहीनी करत होते त्या गारूडाचा वाराही मला शिवला नव्हता.आणि तरीही मला त्याच्या अभिनयातील मोठेपणाने भारावून टाकले होते.आनंद,अमरप्रेम,सफर,खामोशी,थोडीसी बेवफाई अशा अनेक चित्रपटातून राजेशने काळजाचा ठाव घेतला आहे.राजेशच्या जाण्याने आज हे सारं नजरेसमोरं उभं राहीलं आहे,अगदी सिनेमास्कोप स्वरूपात.त्यामुळे राजेश गेला तेंव्हा मनात प्रचंड खळबळ माजली होती.पण त्या खळबळीला वाट देण्यासाठी शब्द सापडत नव्हते.ते शब्द महेश भट यांनी दिले.-"आपल्या जवळचं कोणी जातं तेंव्हा आपणही थोडे-थोडे मरत असतो.राजेश खन्ना यांच्या जाण्याने आमचे असेच झाले आहे." भट यांच्या या शब्दासाठी त्यांनी आजवर निर्माण केलेल्या सर्व टुकार (अपवाद-सारांश)चित्रपटांकरिता तसेच हाश्मी नांवाच्या तद्दन फालतू नटाला या चित्रपट जगात आणण्याच्या प्रमादासाठी मी त्यांना माफ करायला तयार आहे.
Related Articles
This post first appeared on माà¤à¥€ अà¤à¤¿à¤µà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€, please read the originial post: here