Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

वो फिर नही आते…

आपल्या आयुष्यात काही लोकांचे स्थान अतिशय जवळचे असते. त्यांचा आणि आपला जणू वेगळाच ऋणानुबंध असतो. आपण कधीही त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतो. आपल्या ज्या गोष्टी कोणाला सांगायला धजावणार नाही अशा गोष्टी त्यांना सांगत असतो. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत असतो. त्यांच्यावर हक्काने रागावत असतो, रुसत असतो.

आपल्याकडे एखादे कार्य असले आणि ते नाही आले तर खूप रुखरुख लागून राहते. सगळे आले आणि कार्यही सुंदर रीतीने पार पडले तरी. आणि त्यांच्याकडे एखादा कार्यक्रम असला आणि आपण नाही जाऊ शकलो तर त्यांनाही असेच वाटते.

पण कधी तरी बोलण्यातून एखादा गैरसमज होतॊ. आपण संतापून किंवा रागावून त्या व्यक्तीला असे काही बोलतो की ती व्यक्ती आपल्याला कायमची दुरावते.

मी मधू गानू यांचं ‘सहवास गुणीजनांचा‘ हे पुस्तक वाचत असताना पु ल देशपांडे यांनी मधू गानू यांना लिहिलेलं एक पत्र माझ्या वाचनात आलं. सहसा पु ल गंभीर लिहीत नाहीत. पण हे पत्र मात्र तशा प्रकारचं आहे. हे पत्र वाचताना पुलंच्या हळव्या आणि संवेदनाक्षम मनाचा प्रत्यय येतो. वाचता वाचता नकळत आपणही अंतर्मुख होतो.

या पत्राचं वैशिष्ट्य असं की हे पत्र पुलंनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात लिहिले आहे. त्यात निरवानिरवीची भाषा आहे. इतरांसाठी पुलंनी आणि सुनीताबाईंनी केलेल्या त्यागाचा उल्लेख आहे. त्यामुळे हे पत्र आपल्या घरातीलच कोणी वडीलधाऱ्या माणसाने आपल्याला लिहिलं आहे असं वाटतं.

या पत्राची पार्श्वभूमी थोडक्यात अशी. मधू गानू हे पुलंच्या अत्यंत निकटचे. जणू त्यांच्या घरातीलच एक. पण काही कारणाने मधू गानूंचा गैरसमज झाला आणि त्यांनी संतापून पुलंना नको ते लिहिले आणि जणू त्यांच्यातले संबंध तुटणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. या प्रसंगी पुलंनी त्यांना जे पत्र लिहिलं ते अप्रतिम आहे. निमित्त जरी मधू गानूंचं असलं तरी ते तुम्हा आम्हा सर्वांनाच मार्गदर्शक आहे. या पत्रात पुल म्हणतात –

‘… माणसाने एकदा स्वतःच्या विचारशक्तीचा ताबा रागाच्या स्वाधीन केला की प्रत्येक कृती विपरीत दिसायला लागते. सहानुभूतीपूर्वक, समजूतदारपणे विचार करण्याची शक्तीच नाहीशी होते. तू रागावलास, रुसलास, चिडलास तरी हरकत नाही. आपण कोणीच रागलोभ जिंकलेले संतमहंत नाही. पण त्याची परिणीती ‘ मधू मेला ‘ अशासारखी वाक्ये लिहिण्यात होऊ नये… तू आमच्या घरी येणार नाही असे म्हटलेस तरी तू जिथे असशील तिथे आम्हाला यावे लागेल. आयुष्यात फारतर एक किंवा दोन माणसे अशी येतात, की जिथे क्षुद्र व्यक्तिगत मानापमानाचे विचार उद्भवण्यापूर्वीच मोडून टाकावे लागतात. अशी स्नेहबंधने फार नसतात. तसे परिचित किंवा मित्रआप्त वगैरे खूप असतात. पण जिथे स्नेहबंधने एकरूपता असते अशी नाती कुठल्या तरी पूर्वयोगाने जमली असावी असे म्हणण्याइतकी दुर्मिळ असतात. सुखदुःखाच्या क्षणी त्यांनी जवळ नसणे हे दुःसह असते. अशा माणसांनी ही अशी आततायी वृत्ती धरून चालत नसते. ‘

पुल पुढे लिहितात, ‘ हसून खेळून आयुष्यातली दुःखे कमी करीत जगण्याची संधी असताना आपणच आपली आयुष्ये रागाने मलीन करीत असतो. राग येणे आपल्या हाती नसेल पण तो वाढीला न लागू देणे आपल्याच हाती असते. आपल्या अडचणी किंवा दुःखे व्यक्त करायच्या जागा माणसाला फार थोड्या लाभतात. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसे याच त्या जागा. ..’

असे खूप काही सुंदर या पत्रात आपल्याला वाचायला मिळेल. ज्यांना इच्छा असेल त्यांनी मुळातून वाचावे. जागेच्या आणि वेळेच्या मर्यादेअभावी येथे सर्व लिहिणे शक्य नाही.

पण हे पत्र वाचल्यावर मला किशोरकुमारने गायलेलं

‘जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम
वो फिर नही आते…’

हे आपकी कसम या चित्रपटातलं गाणं आठवलं. एकदा अशी माणसं दुरावली की ती पुन्हा नाही येणार. म्हणून जपा आपल्या माणसांना जी आपल्यावर जीवापाड प्रेम करतात.



This post first appeared on स्पंदन, please read the originial post: here

Share the post

वो फिर नही आते…

×

Subscribe to स्पंदन

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×