सिनेमा : मांजा.
कलाकार : अश्विनी भावे, रोहित फाळके, सुमेध मुद्गलकर, आणि इतर.
कथा, पटकथा : जतीन वागले.
Related Articles
संवाद : उपेंद्र सिधये.
दिग्दर्शन : जतीन वागले.
निर्मिती : इंडिया स्टोरीज, एम एफ डी सी.
गुण : पाच पैकी चार ४/५
अधिक : मांजा. जमिनीवरील पतंग हवेत उडण्यासाठीचं महत्वाचं आणि अत्यावश्यक साधन. त्याला ढील दिली तर काचनार, पकडून ठेवला तर कापणार. मुलांचा पालक झाल्यानंतर त्याचं पालकत्व निभावणं हे मांज्यासारखंच दुधारी. आजच्या वयात येऊ पाहणाऱ्या पिढीच्या पालकत्वाचं वाढतं दुधरीपण दाखवणारी हि फिल्म ; हा दुधारी मांजा नेमका कसा हाताळावा हे समजावण्याचं महत्वाचं काम करते. आजच्या संवाद हरवत चाललेल्या काळात हि अशी फिल्म खरतर गरजच. तर असा हा आजचा विषय सुटसुटीतपणे समोर आणणारी कथा, पटकथा. तिला जिवंत करणारा सर्वच कलाकारांचा सुरेख अभिनय आणि या सगळ्याला सुयोग्य दिशा देणारं दिग्दर्शन या गोष्टी आपल्याला हा सिनेमा थिएटरात जाऊन बघायला भाग पडतात.
उणे : या फिल्ममधील पालकत्वाच्या मांजाचं दुधरीपण वाढणाऱ्या विक्री या आजच्या पिढीच्या स्मार्ट गुन्हेगार पात्राची क्रूर मानसिकता संवादापेक्षा दृश्यांद्वारे समोर आली असती तर अधिक परिणामकारक ठरली असती. त्याचं हॉस्टेल लाइफही ठाशीवपणे समोर येत नाही. याचं विकीने हायवे वर केलेल्या गुन्ह्यात पोलीस कसे काय त्याच्यापर्यंत पोहचले नाहीत किंवा मग पुढे त्याला कुणीच कसं अडवलं नाही यासारखे प्रश्न पडत राहतात.
परीक्षण
कथा : हि आहे समिधा आणि तिच्या जीवापाड जपलेल्या जयदीप नावाच्या मुलाची गोष्ट. या जयदीपचंच भवितव्य डोळ्यासमोर ठेऊन माथां करत्या नवऱ्यापासून आणि वाईट भूतकाळापासून वेगळी झालेली समिधा गोव्यातून लोणावळ्याला एक नव्या आयुष्याची सुरुवात करायला येते. अर्थात कितीही फेकायचं म्हटलं तरी भुतकालाच ओझं तिच्या आणि तिच्या मुलाच्या मानगुटीवर बसलेलं आहेच. त्यानेच जयदीप अबोल, लोकांत कमी मिसळणारा, मनात भीती बाळगून कुढणारा झाला आहे. अशा या जयदीप हा लोणावळ्यात विकी नावाचा त्याच्या स्वभावाच्या अगदी उलट बडबड्या, क्रूर , लोकांवर अधिकार गाजवणारा आणि मुख्य म्हणजे जयदीपच्या मनातल्या भीतीचा स्वतःच्या गुन्ह्यासाठी वापर करून घेणारा मित्र भेटतो. अर्थात हा विकी एवढा स्मार्ट आहे कि त्याचे गुन्हे आणि गुन्हेगारी प्रवृत्ती कधीच कुणासमोर आलेली नाहीये. अशा या विकी सोबत जयदीपचं आणि त्याला जीवापाड जपणाऱ्या समिधाचं काय होत हे सिनेमातच पाहणं योग्य ठरेल.
पटकथा आणि संवाद : गोव्याहून लोणावळ्याला येतानाच्या गाडीत नवऱ्यासोबतचा एकत्र कुटुंबाचा फोटो फाडण्याच्या परिणामकारक दृश्याने सुरु झालेली पटकथा विकीची गुन्हेगारी प्रवृत्ती सगळ्यांसमोर अनण्याचा शेवटाच्या दृशांपर्यंत चढत्या क्रमाने सिनेमाला परिणामकारकतेच्या शिखरावर नेते. यातले संवाद आजच्या पिढीची आणि सिनेमात दाखवलेल्या एका विशिष्ट वर्गाची वास्तवातली भाषा बोलतात. त्यामुळे त्या सिनेमाला लाभकारकच ठरतात.
दिग्दर्शन : पटकथेचं दृश्यकथेत रूपांतर करणारं आणि पटकथेप्रमाणे मध्ये कुठलाच अडथळा न आणता सिनेमाला चढत्या क्रमाने परिणामकारकतेकडं नेणारं दिग्दर्शन. सिनेमात आलेलं एक गाणंही केवळ कथेची गरज म्हणून येतं. छायाचित्रणातून दिग्दर्शकाची नजर दिसते. अभिनय करत्या कलाकारांची नजर, त्यांचा अभिनय आणि संकलन व इतर तांत्रिक बाबतीत दिग्दर्शकाची पकड दिसते. वर म्हणल्याप्रमाणे विकी या पात्राची गुन्हेगारी प्रवृती , क्रूर मानसिकता संवादापेक्षा दृशांद्वारे समोर अली असली तर अधिक परिणामकारक ठरली असती. असो दिग्दर्शकाची एकूण चित्रपटाची मांड आणि विषयाची मांडणी शेवटापर्यंत अगदी पक्की राहते.
छायाचित्रण : कोणतीही ‘ सैराट ‘ चमकृती न करता महाराष्ट्रातही परदेशाला लाजवतील अशी लोकेशन्स आहेत याची ओळख करून देणारं छायाचित्रण. ते पटकथा आणि संवादाप्रमाणे सिनेमाला पूरक ठरतं.
संगीत : कथेची गरज म्हणून आलेलं (केवळ ) एक गाणं आणि भावनांचा खेळ अधिक गडद करणारं पार्श्वसंगीत सिनेमाच्या परिणामकारकतेत भर घालतं.
अभिनय : नवऱ्याचं जोखड झुगारल्यानंतरचा मोकळेपणा, नंतर मानगुटीवर बसणारं भूतकालाच ओझं, मुलाचं पालकत्व निभवतानाची घालमेल आणि शेवटाचा करारी, धाडसीपणा समिधा झालेल्या अश्विनी भावे यांनी जिवंत केला आहे. हीच गोष्ट रोहित फाळकेंच्या जयदीपची. सुरुवातीचा अबोल अवघडलेपणा आणि शेवटी झालेला बदल त्याने अगदी योग्यपणे दाखवला आहे. चित्रपट अभिनयाचा पहिलाच प्रयत्न असणाऱ्या सुमेध मुद्गलकरने विश्वास बसणार नाही असा स्मार्ट आणि क्रूर गुन्हेगार वठवला आहे. या तिघांना इतर कलाकारांची अगदी सुयोग्य अशी साथ लाभली आहे.
गोळाबेरीज : आजची वयात येऊ पाहणारी पिढी आणि त्यांचे पालक यांचे प्रश्न मांडणारा. नुस्ते प्रश्नच मांडून न थांबता त्यावर उत्तरं शोधणारा हा सिनेमा वयात येऊ पाहणारी पिढी आणि त्यांचे पालक यांनीच नव्हे तर तुम्ही आम्ही प्रत्येकाने आवर्जून पाहायलाच हवा असा आहे.