आज संपूर्ण भारतभर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची चर्चा होत आहे. सध्या सोशल मीडिया वर हा विषय ‘हॉट’ झालेला आहे. साहजिकच अनेक वस्तूंपैकी घरात वापरल्या जाणाऱ्य चिनी मातीच्या बरण्या चीनमधून येतात की भारतात बनतात, असा प्रश्न आपल्यापैकी अनेक लोकांना पडत असेल!
Related Articles
चिनी मातीच्या बरण्या चीनमधून भारतात येतात का? तर त्याचे उत्तर आहे ‘नाही.’
मग चिनी माती आली कुठून?
चीनमधील काउलिंग नावाच्या टेकडीत ‘केओलिनाइट’ हे औद्योगिक खनिज सापडत असल्यामुळे या मातीला ‘काउलिंग’ असे नाव पडले. हे खनिज चीनमध्ये आढळते म्हणून याला ‘चिनी माती’ म्हणतात. या केओलिनाइटचा उपयोग चिनी मातीची भांडी व इतर वस्तू तयार करण्यासाठी होतो.
भारतामध्ये उच्च प्रतीच्या चिनी मातीचे साठे बिहार, कर्नाटक, केरळ तसेच दिल्ली व जबलपूर जवळच्या भागात आहे. पश्चिम बंगाल, ओरिसा, गुजरात, राजस्थान व तामिळनाडू या राज्यातही चांगले केओलिन मिळत असले तरी देखील चिनी मातीची भांडी उत्तर प्रदेशातील “खुर्जा” या गावात तयार होतात. चिनी मातीची भांडी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल भारतातील याच राज्यातून खुर्जा गावात येतो.
चिनी मातीची भांडी ‘खुर्जा’ येथेच का तयार होतात?
यासाठी आपल्याला इतिहासाचा मागोवा घ्यावा लागेल. मंगोल साम्राज्याचा शासक तैमुरलंग चौदाव्या शतकात भारतात आला. तो अत्यंत क्रूर होता. तो स्वतःला दुसरा चांगेझखान समजत असे. अख्या जगावर राज्य करायचं त्याचं स्वप्न होतं. त्याने इराण, अझरबैजान, अफगाणिस्तान, कुर्दीस्तान हे देश जिंकले. त्याचं पुढचं लक्ष होतं भारत. तो अफगाणिस्तान मार्गे भारतात आला. वाटेतील सगळी गावे त्याने बेचिराख करत दिल्लीकडे कूच केली.
तेव्हा दिल्लीचा सुलतान मेहमूद तुघलक याने मोठे सैन्य पाठवून तैमुरवर आक्रमण केले. झालेल्या युद्धात दिल्लीच्या सुलतानाचा तैमुरने पराभव केला. दिल्ली तैमुरच्या ताब्यात आली. पण तैमुर खूप दिवस दिल्लीत थांबला नाही. त्याने पुढे उझबेकिस्थान जिंकण्यासाठी कूच केले. जाता जाता तो इथले कारागीर सोबत घेऊन गेला.
भारतात असतांना तैमुरचा मुक्काम दिल्ली जवळच्या ‘खुर्जा’ या गावी होता. तैमुर परत गेला पण त्याच्यासोबत आलेले काही सैनिक मात्र खुर्जामध्येच थांबले. हे तैमुरचे सैनिक मूळचे कुंभार होते. चिनी मातीची भांडी बनवण्याची मंगोल कला त्यांनी खुर्जामध्ये रुजवली. पुढे हे गाव चिनी मातीच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध झाले.
आज चीनला मागे टाकून “खुर्जा” “चिनी मातीच्या भांड्यांची राजधानी” बनला आहे. या भांड्यांना विदेशातही भरपूर मागणी असते. येथील कलात्मक चिनी मातीच्या वस्तूंची अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आदी देशात निर्यात सुध्दा होते.
चिनी मातीच्या बरण्या-
लोणच्यासाठी लागणाऱ्या चिनी मातीच्या बरण्या उत्तर प्रदेशातील “खुर्जा” या गावातच तयार होतात. येथे त्याचे अडीचशे कारखाने आहेत. आधी या बरण्या साध्या तयार होतात व नंतर त्यावर चिनी मातीचा लेप चढवला जातो. तो साधारणतः पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा असतो. हा लेप चढवल्यामुळे ही बरणी एअरप्रूफ होते. त्यामुळे लोणचे जास्त दिवस टिकते. यातल्या काही बरण्यांना फिरकीचे झाकण असते. ते फिरवून बंद करता येते. ज्या बरण्यांना नुसते वरून ठेवण्याचे झाकण असते, तिच्या तोंडावर आधी स्वच्छ सुती कापड ठेवून मग त्यावर झाकण ठेवावे लागते. ही बरणी खूप सुरक्षित व उच्च प्रतीची मानली जाते.
आजही आपल्यापैकी अनेकांच्या घरी पिढ्यानपिढ्या टिकलेल्या बरण्या आहेत. याचे श्रेय जाते भारतातील “खुर्जा” गावाला!
लोणचे बरेच दिवस टिकावे म्हणून लागणाऱ्या खास बरण्या येथूनच भारतभर विकायला पाठवल्या जातात. या बरण्या आणि चीन याचा काहीच संबंध नाही. थोडक्यात या बरण्या “मेड इन चायना” नाहीत तर त्या “भारतातच’ तयार होतात…”मेड इन इंडिया!”
The post चिनी मातीच्या बरण्या चीनमधून येतात का? appeared first on गर्जा महाराष्ट्र.