माणसाला मरणाचे भय वाटते.त्यामुळे तो सतत मरणापासून दूर पळण्याचा असफल प्रयत्न करत असतो.आपल्या आजूबाजूला होत असलेले दुर्दैवी व नैसर्गिक मृत्यू बघूनही त्याला मृत्यू नामक सत्य उमजून घ्यावेसेच वाटत नाही.प्रत्येक मनुष्य जणू आपण चिरंजीव आहोत याचा संभावनेने ग्रासला आहे.पण याचा अर्थ असा नाही की जगण्यावर प्रेम करू नये पण त्याचवेळी जगण्याचा मोह आणि आणि उत्कंठा टाळता आली पाहिजे. असे असले तरी मनुष्य जीवनात असे प्रसंग येतात की त्याला जीवन अगदी नकोसे होते.असाध्य रोग, नैराश्य यातून मानवाला कधीकधी या जीवनरुपी मोहातून मुक्त व्हावेसे वाटते.यातूनच कधीकधी तो आत्महत्या करतो.पण आत्महत्येला स्वेच्छामरण नाहीच म्हणता येणार.कारण आत्महत्या ही सार्वजनिक ठिकाणी न करता मनुष्य एकांतवासात करतो.मग प्रश्न असा उपस्थित होतो की देशाच्या सीमेवर वीरगती प्राप्त करणारा सैनिक स्वेच्छामरण पत्करत असतो काय ? तर नाही, सैनिकी पेशा जरी त्याने आपल्या पसंतीने निवडला असला व आपली गाठ मरणाशी होऊ शकते याची त्याला जाणीव असली तरीपण आपण त्याला स्वेच्छामरण पत्करले असे नाही म्हणू शकत.ते एक वीरमरण असते.जे त्याने देशासाठी स्वीकारले असते.
एखाद्या असाध्य रोगाने मानवास ग्रासले असेल.तो तीव्र मरणयातना सोसत असेल किंवा त्याच्याकडून कुठलेही समाजपयोगी काम होत नसेल.एका विशिष्ट वयानंतर प्रत्येक मनुष्यास असा स्वेच्छामरणाचा अधिकार असावयास हवा.कुठल्याही हेतुविना जीवन टिकवून ठेवण्यास मनुष्यास बाध्य करणेच मुळात चुकीचे आहे.जैन धर्मात याविषयी मार्गदर्शन केले आहे.शरीरात इतरांची वा स्वतः ची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काळजी घेण्याची थोडीही शक्ती शिल्लक नसेल तर त्या व्यक्तीस मरणप्राप्ती होईपर्यंत उपवास करण्याचा अधिकार आहे.एका विशिष्ट वयानंतर आपले जीवितकार्य पूर्ण झाले आहे व आता संसाराला आपला काही उपयोग नाही असे ज्या मानवाला वाटते त्याला योग्य शहानिशा करून कायदेशीर इच्छामरणाची परवानगी दिली गेली पाहिजे.आपल्या देशात तसा कायदा नाही पण त्यावर अधून मधून चर्चा घडत असते.हे स्वागतार्ह पाऊल म्हणावयास हवे.स्वेच्छामरण हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे.प्रत्येकाला असा मूलभूत अधिकार असायला हवा की, एका ठराविक वयानंतर जेव्हा आपण खूप जगून घेतले आहे असे वाटू लागले आणि उगाच जीवनाचे ओझे वाहण्याची ज्याची इच्छा नसेल....त्याला शरीर सोडण्याचा पूर्ण अधिकार असावा.हा त्याचा मूलभूत अधिकार आहे.खरे तर प्रत्येक दवाखान्यात यासाठी वेगळा विभाग असावयास हवा जिथे असे व्यक्ती दाखल होऊ शकतील.त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू देऊन मग कुठलाही आकस अथवा तक्रार न करता जगाचा निरोप घेऊ दिला पाहिजे कारण योग्यवेळी घेतलेला निरोप हा नेहमी आल्हाददायक असतो.
आज वैद्यक शास्त्राने खूप प्रगती केली आहे.इच्छामरणाचे दोन पर्याय आहेत.एक प्रत्यक्ष आणि दुसरा अप्रत्यक्ष.प्रत्यक्ष प्रकारात त्वरित पण वेदनारहित जीवनाचा शेवट करता येते.अप्रत्यक्ष या प्रकारात मरण अटळ असले तरी ते खूप हळुवार असते.प्रत्यक्ष प्रकार म्हणजे जवळजवळ खून या सदरात मोडेल.पण हा पर्यायही कायदेशीर करावयास हवा.वीस वीस वर्षे मरणयातना सोसणाऱ्या रोग्यास योग्य ती पडताळणी करून इच्छामरण देता येईल काय ? यावर विचार नक्की व्हावयास हवा.आज वैद्यकशास्त्र खूप प्रगत झाले आहे.प्रत्येक रोगाविरुद्ध आपला लढा सुरूच आहे.कित्येक रोगांवर आपण विजय मिळविला आहे.पण ही लढाई कुठवर लांबवायची हे आपनालाच ठरवावे लागेल.
आजकाल बहुतेक रुग्ण हे रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतात.त्या पंचतारांकित कोंडवाड्यात आप्तस्वकीय पण जवळ नसतात किंवा हेतुपुरस्सर दूर ठेवले जाते.अमेरिकेत रुग्णाला त्रास देणारे उपचार करता येत नाहीत.अशा उपचाराविरुद्ध रुग्ण न्यायालयात दाद मागू शकतो.अशा या मृत्यूला कवटाळण्यापेक्षा आप्तस्वकीयांच्या सहवासात पत्करलेले स्वेच्छामरण कधीही चांगले.एखाद्या व्यक्तीला त्याच्या असाध्य व्याधीतून 100% मुक्त करणे निव्वळ अशक्य आहे.असा दावा कुणीही करू शकणार नाही.केवळ रुग्ण म्हणतो म्हणून त्याला स्वेच्छामरण देता नाही येणार.हेही येथे लक्षात घेतले पाहिजे किंवा एखादा डॉक्टर म्हणतो म्हणून त्या रुग्णाच्या जीवनाचा अंत आपणास नाही करता येणार.यासाठी काही नियम करून त्यांना कायदेशीर मान्यता देऊनच मग यावर काय तो निर्णय नक्कीच घेता येईल....व स्वेच्छामरणाची इच्छा पूर्ण करता येईल.